राहाता (जि. अहिल्यानगर) – राहाता तालुक्यातील उंबरी बाळापूर शिवारातील कारवाडी येथे बिबट्याच्या वाढत्या दहशतीने पुन्हा एकदा ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी शेतकरी मच्छिंद्र दगडू कालेकर यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला करून त्यांना जखमी केले. त्यानंतर बुधवारी सकाळी वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात दुसरा बिबट्या जेरबंद करण्यात आला. मात्र, हल्ला करणारा बिबट्या हाच आहे का, याबाबत अजूनही खात्री न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रम आणि असुरक्षिततेची भावना कायम आहे.

कालेकर हे मंगळवारी सकाळी आपल्या शेतात नियमित काम करत असताना बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. त्यांच्या जवळच पत्नी आणि मुलगा उपस्थित असल्यामुळे तातडीने मदत मिळाली आणि मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर वन विभागाने कारवाडी परिसरात तत्काळ पिंजरे लावले होते.
आज सकाळी संदीप होडगर यांच्या पोल्ट्रीशेजारी लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या सापडला असून वन कर्मचाऱ्यांनी त्याला सुरक्षितरीत्या जेरबंद केले. मात्र, हा बिबट्या नेमका कालेकर यांच्यावर हल्ला करणारा आहे की दुसरा, याबाबत अजून स्पष्टता नाही. त्यामुळे बिबट्याची ओळख पटेपर्यंत परिसरात दहशतीचं वातावरण कायम राहील, अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
उंबरी बाळापूर परिसरात यापूर्वीही बिबट्याच्या हालचालींनी नागरिक त्रस्त झाले आहेत. सुमारे १०–१२ दिवसांपूर्वी याच परिसरात बिबट्याने संदीप होडगर या तरुण पशुपालकाच्या ११ मेंढ्या आणि काही कोंबड्यांचा फडशा पाडला होता. या हल्ल्यात त्यांचे सुमारे ३.५ लाख रुपयांचे नुकसान झाले. त्या घटनेनंतरही वन विभागाच्या पिंजऱ्यात एक बिबट्या अडकला होता.
अतापर्यंत दोन बिबटे जेरबंद करण्यात आले असले, तरी अजूनही परिसरात इतर बिबटे सक्रिय असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी संपूर्ण परिसरात अधिक पिंजरे लावून सर्व बिबटे पकडण्याची मागणी जोरदारपणे केली आहे.
वन विभागाने ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, कोणतीही हालचाल दिसल्यास त्वरित कळवण्याचे निर्देश दिले आहेत. शेतकरी आणि पशुपालकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.